Wednesday, August 8, 2018

ट्रॅक्‍स अँड साईन्सः वाघ मोजतात त्याची गोष्ट

कथाओं से भरे इस देश में 
मैं भी एक कथा हू 
एक कथा है बाघ भी 
इसलिए कई बार 
जब उसे छिपने को नहीं मिलती 
कोई ठीक-ठाक जगह 
तो वह धीरे से उठता है 
और जाकर बैठ जाता है 
किसी कथा की ओट में

वाघ म्हटल्यावर डोळ्यासमोर खूप गोष्टी येतात. तशी ही कविताही आठवते. हे खरंतर एक दीर्घकाव्य आहे. ‘बाघ’ नावाचं. हिंदीतले नामवंत कवी केदारनाथ सिंह यांनी वाघाचं आणि माणसाचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं नातं अशा छोट्या छोट्या रचनांमध्ये मांडलंय. वाघ तसा आपल्या आजूबाजूला असतोच - मिथकांमधून, गोष्टींमधून, प्रतिकांमधून. पण या सगळ्याच्या पलीकडं जाऊन वाघ ही एक अनुभवण्याची चीज आहे. 
छायाचित्रः डी. संजय, पुणे.
राजबिंडं सौंदर्य, सौष्ठव, डौल, धाडस, ताकद या शब्दांना जितक्‍या भाषांमध्ये जितके म्हणून समानार्थी शब्द आहेत, त्या सगळ्यांचे सगळे अर्थ ‘वाघ’ या एकाच कल्पनेत सामावलेले दिसतात. एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा अरण्यात मुक्त संचार करणारा वाघ ज्यांनी ‘...याची डोळा’ पाहिला आहे, त्यांना समजेल मी काय म्हणतो आहे ते. 
पहिल्यांदा वाघ, अॅक्‍च्युली वाघीण, पाहिली ताडोबाच्या जंगलात. पंधरा एक वर्षांपूर्वी. ती दृश्‍यभेट अकल्पित होती. वाघ.. वाघ... करत मचाणावर बसून झाल्यावर, सगळ्या आशा सोडून दिलेल्या असताना झालेली! एका कुठल्यातरी छोट्या जंगलवाटेवरनं कॅम्पसाईटच्या रस्त्याला वळताना ती थेट समोरच आली. दोन बछड्यांसह आरामात फिरायला निघाल्यासारखी. जीपची घरघर ऐकल्यावर तिनं एक क्षणभर थांबून अंदाज घेतला आणि जीपमधल्या सगळ्या एक्‍साईटमेंटकडं चक्क दुर्लक्ष करून, चार पावलं आणखी चालून ती रस्त्याकडेच्या गवतात शिरली. तिचे दोन्ही बछडे तिच्या पाठोपाठ गवतात गडप झाले. 
काही हात अंतरावरून असं अचानक, आयुष्यात पहिल्यांदा वाघाचं दर्शन झाल्यानंतर जे काही वाटलं ते मला आजवर शब्दांत उतरवता आलेलं नाही. हे ‘पहिलेपण’ आठवताना मला आज्जीच्या गोष्टी आठवतात. पाळण्यातल्या मुलाच्या ओढीनी घरी जाणाऱ्या एका ओल्या बाळंतिणीनी वाघाशी झुंज घेतल्याची एक गोष्ट ती सांगायची. ती गोष्ट आजी जशी सांगायची तशी घडली नसणार हे आता समजतं. पण ती गोष्ट सांगताना आजी नेहमी सांगायची, वाघ नजरबंदी करतो. आजीच्या म्हणण्याचा अर्थ, वाघाचं पहिलं दर्शन शब्दांत मांडता आलं नाही, तेव्हा कळला. 
वाघ झपाटून टाकतो समोर आल्यावर. आणखी एक किस्सा असाच ऐकलेला. ताडोबातलाच. गेले दोन-तीन दिवस एका पाणवठ्यावर वाघ येतो आहे, असं कळल्यानं दहा-बारा कॅम्पर्सनी दुपार उतरता उतरता पाणवठ्यालगतच्या मचाणावर डेरा जमवलेला. यातल्या निम्म्या लोकांची पहिलीच वेळ वाघ पाहण्याची; किंबहुना अशा पद्धतीनं जंगलात वावरण्याचीच. त्यामुळं ते जरा एक्‍साईट झालेले. मचाणापासून समोर थोड्या अंतरावर तो पाणवठा आणि त्याला लगटून जाणारा रस्ता आणखी थोडा पुढं जाऊन, वळून दिसेनासा झालेला. बऱ्याच वेळानी पाणवठ्यापलीकडून चितळाचा आवाज ऐकू आला. या अलार्म कॉलमुळं मचाणावरची अनुभवी मंडळी सतर्क झाली. मचाणावर आणखी थोडी एक्‍साईटमेंट. काही क्षणांची उत्सुकता.. आणि मचाणासमोरचा रस्ता जिथं वळत होता तिथून आत जाणाऱ्या पायवाटेवरून तो आला. त्यानी आणखी दोन पावलं पुढं टाकली. मचाणावर थोडी खपफस. वाघानी मचाणावरचे ते दबके आवाज बहुधा टिपले असावेत. कारण तो थबकला. नाक वर करून त्यानी कसला तरी अदमास घेतला, आणि तो आला तसाच मागं वळला. हे सगळं नाट्य घडायला काही सेकंद लागले. तितका वेळ ते सौंदर्य मचाणावरच्या दहा-बारा दुणे वीस किंवा चोवीस डोळ्यांसमोर होतं, प्रत्येकाच्या हातात कॅमेरा होता; पण एकालाही फोटो घ्यायचं सुचलं नव्हतं. 
तुम्ही वाघाला पाहायच्या आधी वाघानी तुम्हाला किमान पंचवीस वेळा पाहिलेलं असतं, असं म्हणतात. जंगलात वाघ ‘बघायला’ म्हणून जाणाऱ्यांना वाघ दिसतो ही खरं एकतर वाघाची चूक असते किंवा दुर्दैव! जंगलात नेहमी फिरणाऱ्या लोकांकडं चौकशी करून पाहा; अगदी रस्त्याच्या पलीकडं किंवा बाजूला गवतात, बांबूच्या बेटांत बसलेला वाघ दिसता दिसत नसल्याचे अनेक किस्से त्यांच्या अनुभवाच्या पोतडीत असतील. 
आपल्या लोककथांपासून ते ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...’ पर्यंतच्या बालकथांपर्यंत वाघ आहे. वाघ आणि सिंह भारतीय परंपरेतल्या प्राचीन शिल्पकृतीतही आढळतात, पण त्यात वाघाची प्रतिमा सर्वांत प्राचीन आहे, असं दुर्गाबाई भागवतांनी एका ठिकाणी लिहिलं आहे.
भारत हा पृथ्वीतलावरचा एकमेव देश आहे, जिथं वाघ (जीवशास्त्रीय परिभाषेत - पॅंथेरा टायग्रीस) आणि सिंह (पॅंथेरा लिओ) दोघंही आढळतात. पश्‍चिम गुजरातेतल्या गीरच्या भागात सिंहांची वस्ती आहे. आशियायी सिंहांची ती आता जगातली एकमेव वस्ती आहे. पंजाब, राजस्थानच्या वाळवंटाचा काही भाग आणि कच्छ वगळता काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्‍चिम किनाऱ्यापासून पूर्वोत्तर भारतातल्या घनदाट जंगलांपर्यंत भारतात सगळीकडं वाघ आहेत. किंबहुना वाघाचा हा जो सार्वत्रिक आढळ आहे, त्याच्याच जोरावर भारताचा राष्ट्रीय प्राणी ठरवण्याच्या शर्यतीत वाघानं सिंहावर मात केली. वन्यजीव मंडळानं जुलै १९६९ मध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह असावा असं ठरवलं होतं; पण तीन-साडेतीन वर्षांतच सिंहाची जागा वाघानं घेतली. हा निर्णय झाला त्यावेळी व्याघ्रसंरक्षणाचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात होता. 
ऋग्वेदात वाघाचा उल्लेख नाही; पण हरप्पा आणि मोहें-जो-दारो येथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या सिंधू संस्कृतीतल्या एका मोहरेवर वाघाचं चित्र आहे. त्यावरून सिंधू नदीकाठच्या लोकांना वाघ माहिती असावा असा निष्कर्ष काढता येतो, असं विश्‍वकोषातल्या नोंदीत म्हटलं आहे. अथर्ववेदात मात्र वाघ आणि सिंह या दोन्ही प्राण्यांचे उल्लेख येत असले तरी वाघाला त्यात प्राधान्य दिलेलं आहे, असं वाचायला मिळतं. लोककथा, धार्मिक कल्पना, मिथकं या सगळ्यांतून वाघ आपल्याशी घट्ट जोडला गेला आहे.  उपलब्ध संशोधनानुसार वाघ मूळचा उत्तर यूरेशियातला. तिथून तो दक्षिणेकडं सरकला. पूर्व तुर्कस्तानापासून ते रशिया, चीन, भारतासह आग्नेय आशियापर्यंत वाघ पसरला. संशोधकांच्या मते, हा विस्तार भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वाघाची सवय अधोरेखित करतो. भारतात वाघाचा प्रवेश (पूर्वीच्या) ब्रह्मदेशातून झाला असावा, असं संशोधक मानतात.
वाघाच्या दिसण्याला राजसस्पर्श देणाऱ्या वाघाच्या कातड्यानीच त्याचा मोठा घात केला, असं म्हणावं लागेल. त्याशिवाय वाघाच्या भोवती गुंफलेल्या पुरुषत्वाच्या कल्पना आहेतच. असंख्य गैरसमज आणि मानवी हव्यासापोटी जगभर औषधांपासून ते दागिन्यांपर्यंत असंख्य गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या वाघाच्या कातडीचा, इतर अवयवांचा अगदी रक्त आणि चरबीचा व्यापार अब्जावधी डॉलरच्या घरात जातो असं सांगणारे अनेक अहवाल आहेत. चार वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी तस्करांच्या एका टोळीकडून अठरा किलो वजनाच्या वाघाच्या कवट्या, हाडं, नखं आणि दात जप्त केले होते. वाघांच्या नऊ उपजातींपैकी बाली वाघ आणि कॅस्पियन वाघांचा माणसानी कधीच निर्वंश केला आहे. व्याघ्रसंवर्धनाचे प्रयोग होत असले तरी भारतीय वाघांसह जावा, सुमात्रा आणि सायबेरियातले वाघ अजूनही वेगवेगळ्या कारणांनी धोक्‍यात आहेत. 
असा वाघ आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली व्याघ्रगणनेची एक छोटी बातमी. दर चार वर्षांनी होणारी ही व्याघ्रगणना यावर्षी होते आहे. त्या गणनेचा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वीच संपला. जंगलातल्या वाघांची ही मोजणी वन्यजीव व्यवस्थापनात अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. वाघ हा जीवशास्त्रीय उतरंडीच्या सर्वांत वरच्या टोकावर आहे असं मानलं जातं. एखाद्या जंगलात वाघ आहे, याचा अर्थ ते जंगल सर्वार्थानी परिपूर्ण आहे. निसर्गाच्या साखळीतला कोणताही प्राणी पृथ्वीच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होणं, त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास आक्रसत जाणं हे विनाशाच्या दिशेनं पडलेलं आणखी एक पाऊल असतं, हे मनुष्यप्राण्यांपैकी निदान काही जणांना उमगलं आहे. वाघ समजावून घ्यायचा असेल, तर हरणं समजावून घ्यावी लागतील, असं टायगर बॉयलॉजिस्ट मेल सनक्विस्ट यांनी म्हटलं आहे. हरणं समजावून घ्यायची याचा अर्थ झाडं, माती, गवत आणि भूप्रदेशाचा अभ्यास. वाघाचा सगळ्याच पर्यावरणाशी असा थेट संबंध आहे.
यंदाची व्याघ्रगणना जराशी वेगळी आहे. एकतर पहिल्यांदा भारत, नेपाळ आणि बांगलादेशात मिळून एकत्रितपणे ही गणना होते आहे. यावर्षी वाघ मोजण्यासाठी आणखी आधुनिक, अँड्रॉईड-बेस्ड तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे, शिवाय नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अॅथॉरिटीनी (एनटीसीए) व्याघ्रगणनेच्या एकूण प्रक्रियांमध्ये आणखी सुसूत्रता आणली आहे. 
वन्यजीव रक्षणासाठी आपल्याकडं होत असलेल्या प्रयत्नांचा इतिहास सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीपर्यंत मागं जातो. हरणांना संरक्षण देणाऱ्या बिश्‍नोईंसारख्या अनेक जनसमूहांनी देवरायांसारख्या कल्पनांमधून वनं आणि वन्यप्राणी जपले. आधुनिक माणसाच्या हव्यासानी, विकासाच्या कल्पनांनी मात्र या सगळ्या परंपरांवर मात केली. अजूनही पुरेसे नसले तरी हे चाक होता होईल तो उलटं फिरवण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत. इंदिरा गांधींसारख्या निसर्गप्रेमी पंतप्रधानांनी सत्तरीच्या दशकात निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भात दाखवलेली दूरदृष्टी आणि कणखरपणाची पुण्याई आज आपल्या मदतीला येते आहे. 
पर्यावरण रक्षणाचे हे प्रयत्न योग्य दिशेनं जाताहेत की नाही हे तपासण्याचा एक मापदंड म्हणजे ही प्राणीगणना. वन्यजीव व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा टप्पा. 
इंग्रज भारतातून चालते झाले, तेव्हा इथं लाखभर वाघ होते. माणसाच्या प्रगतीचे नवे आलेख मांडणाऱ्या एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला ही संख्या सहा वरून चार आकड्यात आली. या आधीच्या व्याघ्रगणनेनुसार भारतात फक्त सव्वाबाविसशे वाघ शिल्लक होते. या संख्येच्या अचूकतेबद्दल शंका असल्या तरी ही संख्या जगभरातल्या वाघांच्या एकूण संख्येच्या निम्मी आहे, याची नोंद घ्यायला हवी. आजमितीला जगातल्या तेरा देशांमध्ये वाघ आहेत. कधीकाळी ही संख्या पस्तीस होती.
वन्यजीवतज्ज्ञ जॉर्ज शेल्लर यांनी पन्नास वर्षांपूर्वी भारतातल्या वाघांचा पहिला पद्धतशीर अभ्यास केला. या अभ्यासाकरता शेल्लर यांनी ‘बांधलेले’ लपणगृह - शेल्लरज्‌ हाईड - आजही मध्यप्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात पाहायला मिळते. शेल्लर यांचा एक किस्सा ऐकायला मिळतो. एका रात्री लपणगृहात मुक्कामाला गेल्यावर शेल्लर यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या स्थानिक सहायकाला परत जायला सांगितलं. अंधारातून परत गावात जायला तो कांकू करत होता. शेल्लर यांनी त्याच्या भीतीचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, की आपण येत असताना वाघानी आपल्याला पाहिलं आहे. येताना आपण दोघं होतो, जाताना मी एकटाच आहे, हे वाघाच्या लक्षात आलं तर माझी काही खैर नाही. त्यावर शेल्लर त्याला म्हणाले, ‘तू बिनघोरपणे स्वतःशीच काहीतरी बडबड करत परत जा; वाघाला वजाबाकी येत नाही.’ 
गेल्या चाळीस वर्षांमध्ये वन्यजीव गणनेतही खूप बदल झाले आहेत. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसारखी घरोघर जाऊन वन्यप्राणीगणना करता येत नाही. मग एका विशिष्ट दिवशी पूर्ण चोवीस तास पाणवठ्यावर थांबून तिथं येणारे प्राणी प्रत्यक्ष मोजणं, त्यांच्या नोंदी करणं, विशिष्ट भूभागात प्राणी मोजण्याचा प्रयत्न करणं, पावलांचे ठसे घेऊन त्याद्वारे प्राण्याच्या एकूण संख्येचा अंदाज बांधणं आणि आता गेल्या काही दशकांपासून कॅमेरा ट्रॅप, जीआयएस, ड्रोन, लाँगरेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी (लोरा) सारखे तंत्रज्ञानही वन्यजीव गणनेसाठी वापरलं जातं. पावलांचे ठसे, आवाज, विष्ठेचे, केसांचे नमुने यांवरून प्राण्यांबद्दल काही अंदाज बांधता येत असले तरी ते अपुरे आहेत. या पद्धतीतल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी व्याघ्रतज्ज्ञ उल्लास कारंत यांनी १९८० पासून कॅमेरा ट्रॅपच्या वापरावर भर दिला. 
यंदाच्या व्याघ्रगणनेसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी मॉनिटरिंग सिस्टिम फॉर टायगर-इंटेन्सिव्ह प्रोटेक्‍शन अॅण्ड इकॉलॉजिकल स्टेटस (एम-स्ट्रर्लपेस) हे अॅप बनवलं आहे. वाघांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा, त्यांचं भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या, त्यांचे अधिवास, मानवी हस्तक्षेपाच्या खाणाखुणा या अॅपच्या सहाय्यानं नोंदवल्या जातील. अॅपमध्ये आधीच असलेल्या माहितीच्या आधारे नव्यानं नोंदवलेल्या माहितीचे बिनचूक विश्‍लेषण शक्‍य आहे, असं वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 
गेल्या चार वर्षातले व्याघ्रसंवर्धनाचे प्रयत्न लक्षात घेता आता भारतातली वाघांची संख्या तीन हजारांवर पोचली असेल, असा वनअधिकाऱ्यांचा अंदाज आहे. चार वर्षांपूर्वी ती २२२६ होती आणि २०१० मध्ये ती १७०६ होती. अर्थात जानेवारी २०१८ च्या व्याघ्रगणनेचे तपशील हातात येण्यासाठी पूर्ण एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 
भारतात सध्या एक्केचाळीस व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. वाघांची संख्या वाढली असली तरी काही आव्हानं अजून शिल्लक आहेतच. वाघांचे अधिवास वाढलेले नाहीत. रस्ते, धरणं अन्य विकास प्रकल्पांमध्ये अडकलेल्या वाघांच्या जागांचे व्यवस्थापन, दोन अधिवासांना जोडणारे नैसर्गिक मार्ग, जंगलांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांच्या गरजा, त्यांचे आणि निसर्गाचे सहचर्य, त्यांचं जगणं, अजूनही न थांबलेल्या शिकारी, माणूस आणि वन्यप्राण्यांमधल्या वाढता संघर्ष अशा अनेक मुद्‌द्‌यांवर उत्तरं शोधावी लागणार आहेत. 
आज माणूस वाघापासून इतका दुरावला आहे, की वाघाचं नैसर्गिक अस्तित्व पुन्हा अधोरेखित करावं लागणार आहे. वाघ मिथकांमध्ये जितका आदिम आहे तितकाच समकालीनही आहे; त्याच्या असण्यावर आपलं असणं अवलंबून आहे, हे पुन्हा नव्यानं समजावून घ्यावं लागणार आहे. 
टायगर जिंदा है... इतकंच पुरेसं नाही; तो वाढायलाही हवा. 
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक फेब्रुवारी 2018)

Tuesday, August 7, 2018

ट्रॅक्स अँड साईन्सः पंख चिमुकले, पुन्हा रोपले

मोनार्क नावाचं एक फुलपाखरू असतं. तसं पाहिलं तर इवलासा जीव. लांबी सगळी मिळून साडेतीन-चार इंच. ही लांबी पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराची आणि आयुष्य फार फार तर सहा आठवड्यांचं. झळाळते रंग आणि हवेत तरंगल्यासारखं त्याचं जादूई उडणं ही या जिवाची वैशिष्ट्ये. मुख्यतः आढळ दक्षिण कॅनडापासून ते दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडच्या भागात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपाइन्स, उत्तर आफ्रिकेसह जगाच्या अन्य भागांतही मोनार्क सापडतात. इंग्लंडच्या तिसऱ्या विल्यमच्या नावावरून या फुलपाखरांना ‘मोनार्क’ किंवा सम्राट असं नाव मिळालं असे काही संशोधकांचं म्हणणं असलं तरी खुद्द ब्रिटनमध्ये यांचा वावर क्वचितच.
अमेरिकेतल्या अलाबामा, ईडाहो, इलिनॉस, मिनेसोटा, टेक्‍सास, व्हरमॉन्ट आणि वेस्ट व्हर्जिनिया या सात राज्यांनी मोनार्कला आपल्या राज्याचं प्रतीक असण्याचा मान दिलाय. (आपल्या महाराष्ट्रानेही पंखावर झळाळती निळाई मिरवणाऱ्या ब्ल्यू मॉर्मन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे.)  
खरंतर मोनार्कला आख्ख्या अमेरिकेचाच राष्ट्रीय कीटक म्हणून जाहीर करावं अशी मागणी एकदा नव्हे दोनदा झाली. न्यूयॉर्क टाइम्स वगैरे दबदबा असणाऱ्या वर्तमानपत्रातून वाचकांच्या पत्रव्यवहारात मोनार्कच अमेरिकेचा राष्ट्रीय कीटक कसा असू शकतो यावर चर्चाही झाली. पण दोन्ही वेळा मोनार्क अयशस्वी ठरलं.
मोनार्कांचे आणखी एक विशेष म्हणजे यांच्यातली बरीचशी फुलपाखरं स्थलांतर करतात. कीटकांमधलं स्थलांतर हा काही तितकासा अचंब्याचा विषय नाही, पण मोनार्क मात्र काहीच्या काही अंतरं पार करतात. अमेरिकेच्या पूर्व भागातून मोनार्कच्या काही थव्यांनी जवळजवळ पावणेआठ हजार किलोमीटरचं अंतर कापून मेक्‍सिकोपर्यंतचा पल्ला मारल्याच्या नोंदी आढळतात.
या मोनार्क पुराणाचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात अशाच एका पिल्लू मोनार्कनी इंग्लंड-अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांत, न्यूज साईटस्‌वर, वन्यजीवांना वाहिलेल्या पोर्टल्सवर हेडलाइन स्टेटस मिळवलं होतं. हे पिल्लू मोनार्क होतं तीन दिवसांचं. म्हणजे साठीच्या वयातल्या माणसाशी तुलना केली तर साधारण साडेचार वर्षांच्या माणसाच्या पिल्लाइतकं. त्याचा जन्म झाला रोमी मॅकक्‍लॉस्की या तरुण मुलीच्या टेक्‍सासमधल्या घराच्या बागेत. काही विशिष्ट झाडांची लागवड करून फुलपाखरांना आकर्षित करणारी बटरफ्लाय गार्डन तयार करणं हा अनेक अमेरिकी घरमालकांमधला एक वाढता ट्रेंड आहे. रोमीच्या बागेतही गेली तीन वर्षे सुरवंटांचं वास्तव्य आहे. खा खा खाऊन हे सुरवंट कोषांत जातात आणि मग एक दिवस त्या कोषांची नाजूकशी, झळाळती फुलपाखरं होतात. माणसाच्या तुलनेत एक अल्पायुषी आयुष्य नव्यानी सुरू होतं.
तर गेल्या महिन्यात रोमीच्या बागेतल्या एका कोषातून हे पिल्लू मोनार्क उगवलं. पण कोषातून बाहेर येतानाचा त्याचा प्रवास जरा जास्तच जिकिरीचा होता. सुरवंटाचा काय किंवा माणसाचा काय, आपापल्या कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास तसाही सोपा नसतोच; पण आपल्या या मोनार्क पिल्लाचा प्रवास जिवावरच बेतणारा होता. कोषातून बाहेर पडताना अजून ओल्या असणाऱ्या त्याच्या पंखांपैकी एक पंख पुरता तुटून गेला होता. फुलपाखरांना मन असतं की नाही ठाऊक नाही-ऐकण्यावाचण्यात नाही असं काही कधी-पण असेल तर या मोनार्क पिल्लाला खूप दुःख झालं असणार. कारण उडण्याकरिता फुलपाखरांना दोन सारखेच बांधेसूद आणि प्रमाणबद्ध पंख असावे लागतात, आणि फाटका पंख म्हणजे उडणं नाहीच; आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा तर निसर्गाचा नियमच.
पण या मोनार्क बाळाच्या इवल्याशा भाळावर सटवाईनी लिहिलेला लेख काही वेगळाच होता.
तर रोमी मॅकक्‍लॉस्की. रोमी कॉस्च्युम डिझायनर आहे आणि हॅण्ड एम्‌रॉयडरीमध्ये म्हणजे हातानी कशिदे विणण्यात (निदान तिच्या आजूबाजूला) कोणी तिचा हात धरू शकत नाही, अशी तिची ख्याती आहे. रोमीचं आणि फुलपाखरांचं नातं जरा हळवं आहे. बोअर्ड पांडा नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटनी जेव्हा रोमीची मुलाखत घेतली तेव्हा हे नातं उलगडलं. तिच्या आईचं वीसएक वर्षांपूर्वी निधन झालं. मुलीला कायमचं सोडून जाताना आई म्हणाली होती, रोमी जेव्हा जेव्हा तू फुलपाखरू पाहशील, तेव्हा असं समज की, मीच तुला भेटायला आले आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
रोमीला एक दिवस तिच्या बागेत एका झुडपावर तीन सुरवंटं दिसली; आणि तिचं बटरफ्लाय गार्डनिंग सुरू झालं.
पंख फाटलेलं मोनार्क बाळ सापडल्यावर रोमीनी तिच्या घरातल्याच एका खोलीचं ऑपरेशन थिएटर केलं आणि त्या मोनार्कचा तुटलेला पंख चक्क ‘ट्रान्सप्लांट’ केला. काही दिवसांपूर्वी तिला तिच्या बागेत एक मेलेलं मोनार्क फुलपाखरू सापडलं होतं. त्याचा एक पंख तिच्याकडे होता. एक टॉवेल, कपड्यांचा हॅंगर, एक टूथपिक, गोंद, कातरी, कापूस आणि चेहऱ्याला लावायची पावडर वापरून रोमीनी ‘पंखारोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी केली, आणि आश्‍चर्य म्हणजे एक दिवसाची विश्रांती आणि शुश्रुषेनंतर त्या मोनार्कनी दोन्ही पंख पसरून रोमीच्या बागेत झेप घेतली.
या ‘पंखारोपणा’चा व्हिडिओ जगभरात पाहिला गेलाय. फुलपाखराचे पंख आपल्या केसांसारखे किंवा नखांसारखे असतात. त्यामुळे फाटलेला पंख नीट कातरून घेऊन दुसरा पंख तिथे चिटकवताना मोनार्कला भूल वगैरे द्यायची गरज नव्हती आणि मुख्य म्हणजे मोनार्कचा फाटलेला पंख हा अपघात होता, ती जन्मजात शारीरिक विकृती नव्हती.
मोनार्क बाळाला हॅंगरमध्ये नीट अडकवून रोमीनी आधी त्याचा फाटका पंख नीट साफ केला. मग अगदी हलक्‍या हातानी तिनी तिच्याकडचा दुसरा पंख त्या पंखाशी जुळवून घेऊन चिटकवला. मोनार्कच्या पंखांवर असलेल्या काळ्या रेषा अगदी नीट जुळल्या नाहीत, पण हे पंखारोपण यशस्वी झालं. आता एक त्रुटी राहिली. मोनार्क फुलपाखरांमध्ये नरांच्या पंखावर खालच्या बाजूला एक ठिपका असतो. रोमीकडे असलेल्या स्पेअर पंखावर हा ठिपका नव्हता, त्यामुळे नवा पंख मिळालेल्या मोनार्कच्या एकाच पंखावर आता तो नर असल्याची खूण आहे. रोमी म्हणते, ‘‘ठिपक्‍याचं काय एवढं? त्याला आता उडता येणार आहे.’’
तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तिला अनेक प्रश्‍न विचारले. मात्र ‘उत्साहाला आवर घाला,’ असा रोमीनी त्या सगळ्यांना सांगितलंय.
‘पंखारोपणा’वर एक मॅन्युअलच लिहायचा तिचा विचार आहे, पण एक मुद्दा मात्र ती पुन्हा पुन्हा सांगते, तुमचा हात खूपच स्टेडी असायला हवा, नाहीतर करायला जाल एक आणि होईल भलतंच...
***
मोनार्क फुलपाखरांच्या घटत्या संख्येबद्दल गेली अनेक वर्षे अमेरिकाभर चर्चा चालू आहेत. स्थलांतर करणाऱ्या मधमाश्‍या, मोनार्क फुलपाखरे यांच्या संरक्षणाकरिता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीनएक वर्षांपूर्वी एक धोरण प्रसिद्ध केले होते. परागीभवनाच्या एकूण प्रक्रियेतच पर्यायाने अन्नधान्य, फळफळावळ, फुलांच्या उत्पादनात हे कीटक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आश्‍चर्य वाटेल पण ओबामांच्या या धोरणात स्थलांतर करणाऱ्या मोनार्कांसाठी मेक्‍सिको ते मिनेसोटादरम्यान जवळपास दीड हजार मैलांचा ‘बटरफ्लाय कॉरिडॉर’ तयार करण्याचा प्रस्ताव होता. जगातल्या अन्य काही देशांमध्येही असे काही प्रस्ताव आहेत. 
फुलपाखरांवर संशोधन करणाऱ्या मंडळींना विचाराल तर अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे, असं ते सांगतील. भारतातही या संदर्भात अभ्यास होत असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देशभरातल्या महामार्गांवर असंख्य फुलपाखरांचा, मधमाश्‍यांचा, सापांचा जीव जातो, याबद्दल गेली दोनअडीच दशके वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव प्रेमी सातत्याने बोलत आहेत, उपाय सुचवत आहेत. काही वर्षांपूर्वी कोणत्या तरी अभयारण्यातून जाणाऱ्या हमरस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या झाडावर फुलपाखरे ज्यामुळे लांब जातील अशी गंधद्रव्ये लावण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या प्रयोगाचं पुढे काय झालं कोण जाणे...  
***
रोमीच्या गोष्टीच्या निमित्ताने फुलपाखरांविषयी आणखी वाचत गेलो. दरम्यान आणखीही काही काही वाचत होतोच. दुर्गा भागवतांच्या ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ या पुस्तकातल्या ‘एक अभावात्मक संकेत’ या लेखात फुलपाखरांविषयीचा एक वेगळाच संदर्भ मिळाला. तो संदर्भही अगदीच अनपेक्षित -भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाचा. दुर्गाबाई लिहितात, ‘‘काही संकेत अभावात्मक असतात. म्हणजे एखाद्या वस्तूचा ती प्रत्यक्षात कितीही महत्त्वाची असली तरी वाङ्‌मयात उल्लेख नसतो. [...] परंतु काही परमरुचिर वस्तूंचा अभाव संकेतबद्धतेमुळे वाङ्‌मयात येतो. अशा गोष्टीत मी प्रामुख्याने भारतीय वाङ्‌मयातल्या फुलपाखराच्या अभावाची गणना करीन.’’
आपल्या वाङ्‌मयात अमाप निसर्ग वर्णने आहेत. त्यात वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, मासे, नाग-साप, वाळवी, मुंग्या, पतंग आहेत; अगदी इंद्रगोपावर म्हणजे मृगाच्या किड्यावर कवने आहेत, असं सांगून दुर्गाबाई लिहितात, ‘‘परंतु तरीही हा निसर्ग फुलपाखराच्या अभावी खुरटा वाटतो. उणा वाटतो.’’
गोंडी भाषेतली काही कवने आणि बंगाली आणि आसामी साहित्यातले काही उल्लेख वगळता अन्य साऱ्या भारतीय वाङ्‌मयाने फुलपाखरांना नाकारले, असे दुर्गाबाई म्हणतात. या लेखाचा समारोप करताना त्या लिहितात, ‘‘जीवनालाही जिथे क्षणभंगुर म्हणून आम्ही ठोकर मारली, तिथे तर मूर्तिमंत क्षणभंगुर व सुखलोलुप जे फुलपाखरू ते आम्हास कसे रुचावे? [...] भारतीयांनी नादकलेचा परम उत्कर्ष संगीतात साधला तसा दुसऱ्यांना साधता आला नाही. म्हणूनच मला वाटते ‘गुं गुं’ करणारा भ्रमर काळा-ठुसका असूनही आम्हाला प्रिय झाला. [...] पण मूर्तिमंत सौंदर्य पाकोळीच्या रूपाने भ्रमरासारखेच, ‘सरस पाहून चुंबण्या’च्या विद्येत प्रवीण असूनही, केवळ मुके, निःशब्द म्हणून आम्ही नाकारले. सर्वस्वी उपेक्षिले.
दुर्गाबाईंच्या मते पाश्‍चात्य वाङ्‌मयातल्या कल्पनांबरोबर फुलपाखरू नवशिक्षितांच्या लेखनात प्रवेश करते झाले. याच लेखात दुर्गाबाईंनी जगातल्या अन्य संस्कृतींमध्ये फुलपाखरांविषयीच्या कल्पनांबाबतही विस्ताराने लिहिले आहे. ‘फुलपाखरू पाहशील तेव्हा मीच तुला भेटायला आले आहे, असे समज,’ या रोमीच्या आईच्या शब्दांप्रमाणे फुलपाखरू म्हणजे माणसाचा आत्मा ही कल्पना युरोप, जपान, पॅसिफिक बेटे यात प्रसृत आहे. नॉर्थ अमेरिकेतल्या इंडियनातही तो समज रूढ आहे, असा उल्लेख दुर्गाबाई करतात.
असो... दुर्गाबाईंचा हा विलक्षण लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पण आपला विषय तो नाही. राजेशाही शिकारींच्या कथा अगदी कालपरवापर्यंत ऐकल्या-सांगितल्या जात असल्या, त्यातून कितीतरी रमणोत्सुक मने जुळली असली आणि त्यातून पुढे महाभारते घडली असली, तरी संस्कृत वाङ्‌मयातला पहिला श्‍लोक महाकवी वाल्मीकींना स्फुरला तो प्रेमालापात मग्न असताना व्याधाच्या बाणाची शिकार झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या प्रियेच्या विलापातून.
जखमी झालेल्या वन्यप्राण्यांसाठी जीव टाकणारे रोमीसारखे असंख्य लोक जगभर आहेत. ते वन्यप्राण्यांसाठी अनाथालये चालवतात, अडचणीतल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालतात, आजारी प्राण्यांची देखभाल करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडतात, अपंगत्व आलेल्या प्राण्यांची आयुष्यभर काळजी घेतात. नीलिमकुमार खैरे यांच्या भारतीय सर्पविज्ञान संस्थेचं प्राण्यांचं अनाथालय, डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातला वन्यप्राण्यांचा दवाखाना ही आपल्या आजूबाजूची ठळक उदाहरणे. वन्यप्राण्यांना नवजीवन देण्याचे असे प्रयत्न जगभर सुरू असतात.
ग्रीनपीस या पर्यावरणरक्षणाला वाहून घेतलेल्या संस्थेतून बाहेर पडलेल्या पॉल वॅटसननी तर समुद्री प्राण्यांची शिकार करणाऱ्यांविरुद्ध चक्क लढाईच पुकारली आहे. त्यांच्या ‘सी शेफर्ड’ संघटनेचा थेट ‘डायरेक्‍ट अॅक्शन’वरच विश्‍वास आहे. अॅनिमल प्लॅनेट चॅनेल फॉलो करत असाल तर ‘व्हेल वॉर्स’ नावाची सीरिज आठवत असेल. हा पुन्हा वेगळाच विषय.
पंचवीसएक वर्षांपूर्वी सर्पविज्ञान संस्थेच्या अनाथालयाची सुरवात होत असताना पाय मोडलेल्या एखाद्या राखी बगळ्यावर शस्त्रक्रिया करता येते हाच चमत्कार वाटला होता. वनखात्याने सुटका केलेल्या, लोकांनी वाचवलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याकरिता, वाढवण्याकरिता काय काय आणि किती करावे लागते, एखाद्या प्राण्याबद्दल किती बाजूंनी विचार करावा लागतो याचा आपल्याला अंदाजच येऊ शकणार नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सापडलेली बिबट्याची काही पिल्लं वेगवेगळ्या वेळी नीलिमकडे सोपवली होती. या पिल्लांना वाढवतानाचे नीलिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत.
अनेक प्राणी नंतर कात्रजच्या अनाथालयात आले, बरे झाले, निसर्गात परतले. ज्यांना निसर्गात पुन्हा सोडता येणं शक्‍य नव्हतं, ते तिथेच राहिले. ‘मैत्र जीवाचे...’ या पुस्तकात नीलिमनी बाबा बिबट्या आणि अनाथालयातल्या अन्य काही प्राण्यापक्ष्यांबद्दल लिहिलेही आहे.
अगदी तीनएक आठवड्यांपूर्वी नाशिकच्या सुरगणा तालुक्‍यात वनाधिकाऱ्यांना अगदी विकल झालेली तरसाची एक मादी सापडली. अनिलनी, हा नीलिमचा धाकटा भाऊ, मला तिची गोष्ट सांगितली. मग त्यानीच वनपाल अमित साळवे आणि डॉ. अंकुश दुबेंना फोन लावला. आम्ही तिला नाशिकलाच ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, साळवे मला फोनवर सांगत होते. पण तिची एकंदर स्थिती बघून आम्ही तिला कात्रजला हलविण्याचा निर्णय घेतला. ती गरोदर होती. खूप अशक्त झाली होती. तिचं हिमोग्लोबिन प्रचंड कमी झालं होतं. वीसएक दिवस लागले, तिला पूर्ण बरं व्हायला. तिची बाळं वाचली नाहीत; पण ती छान बरी झाली, डॉ. अंकुश सांगत होते. दोन-चार दिवसांपूर्वीच जिथे सापडली होती त्याच परिसरात तिला पुन्हा सोडलं आम्ही, साळवेंनी गोष्ट संपवली.
विकासाच्या रेट्यात माणूस आणि वन्यप्राण्यांदरम्यान एक संघर्ष उभा राहात असताना, माणसाच्या हव्यासापोटी प्राण्यांच्या जातीमागून जाती संकटात सापडत असताना, असे प्राणीमित्र एखाद्या फुलपाखरासाठीही काही वेगळे करू पाहतात, हाच दिलासा आहे.
(प्रथम प्रसिद्धी - सकाळ साप्ताहिक मार्च 2018)